Dehu News : अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये इ.५ वीचे विद्यार्थी, पालकांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन

Dehu News : अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये इ.५ वीचे विद्यार्थी, पालकांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन

अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलचा स्तुत्य उपक्रम

Pckhabar- शिष्यवृत्ती परीक्षार्थींना सरावाची आणि मार्गदर्शनाची नितांत गरज असते, हाच विचार डोळ्यासमोर ठेवून श्रीक्षेत्र देहू येथील सृजन फाउंडेशनच्या अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी तसेच पालकांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शनपर सत्राचे आयोजन करण्यात आले. यासाठी शिष्यवृत्ती परीक्षेच्या अध्यापनाचा २० वर्षे अनुभव असणारे नारायणगाव येथील संकल्प कोचिंग क्लासेसचे डायरेक्टर श्री. किशोर दत्तात्रय हांडे सर यांचे मार्गदर्शन पर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

या व्याख्यानाच्या निमित्ताने उंब्रज येथील महालक्ष्मी विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक श्री. एम. पी .मोरे सर, अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मुख्याध्यापिका डॉ. कविता अय्यर व प्राथमिक विभागाच्या शिक्षिका उपस्थित होत्या. उपस्थित विद्यार्थी, पालक व शिक्षकांशी संवाद साधताना श्री. किशोर हांडे सर यांनी आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. विद्यार्थ्यांची अभ्यासातील गुणवत्ता तपासण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेची गोडी निर्माण करणे यासाठी शिष्यवृत्ती परीक्षा हा उत्तम पर्याय आहे हे सांगितले. पण विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेला बसणे यासाठी पालकांनी विद्यार्थ्यांवर दबाव आणू नये असेही ते म्हणाले. हांडे सरांनी शिष्यवृत्ती परीक्षेचे स्वरूप, कोणकोणत्या विषयांचे पेपर असतात, किती गुणांचे, तसेच त्यासाठी वेळ मर्यादा किती, गुण किती, यांची सविस्तरपणे माहिती दिली. तसेच परीक्षेमध्ये येणारे प्रश्न यांचेही स्वरूप विविध उदाहरणांद्वारे त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. शालेय जीवनात दिलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेमुळे भविष्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांविषयीचे ज्ञान विद्यार्थ्यांना होते. तसेच त्यांच्या मनात स्पर्धा परीक्षांविषयी असणारी भीतीही नाहीशी होते. पालकांना असणाऱ्या विविध शंकांचे निरसन हांडे सरांनी समर्पक अशी उदाहरणे देऊन केले.

सन २०२४ मध्ये इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी निवड चाचणी परीक्षा घेण्यात आली व या परीक्षेतून निवडलेल्या विद्यार्थ्यांसाठी शनिवार व रविवारी विशेष ज्यादा तास घेण्यात येणार असून अनेक तज्ञ मार्गदर्शक या निवड झालेल्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विशेष तयारी करून घेणार आहेत असे मुख्याध्यापिका डॉ. कविता अय्यर यांनी सांगितले. निवड झालेल्या विद्यार्थी व पालकांचा या व्याख्यानासाठी उत्स्फूर्त सहभाग होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सहाय्यक शिक्षिका सौ. प्राची पोटावळे व आभार सौ.रेखा जाधव यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *