Dehu News : पालकांनो… मुलांना मायेचा स्पर्श द्या : इंद्रजित देशमुख

Dehu News : पालकांनो… मुलांना मायेचा स्पर्श द्या : इंद्रजित देशमुख

Pckhabar- जगातील सर्वात मोठा चार्जर कोणता असेल तर तो आईचा स्पर्श आहे… आणि नेमका हाच आपण वापरत नाही, म्हणून मुलांना दिवसातून एकदा तरी मायेचा स्पर्श करा, त्याला मिठीत घ्या, तुमचा हा स्पर्श तुमच्या मुलाला दीर्घायुष्य प्राप्त करून देईल. सृजनदीप व्याख्यानमालेच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या मुख्य कार्यकारी पदावरून सेवानिवृत्त झालेले, लेखक, विचारवंत मा. इंद्रजीत देशमुख यांनी पालकांना हा मुलमंत्र दिला. पालकवर्ग देखील बहुसंख्येने उपस्थित राहत, या व्याख्यानमालेला उदंड प्रतिसाद देत आहेत.

श्रीक्षेत्र देहूतील सृजन फाउंडेशनचे अभंग इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये दि.३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२३ पर्यंत ‘सृजनदीप’ व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प महाराष्ट्र शासनाच्या सेवेतून निवृत्त झालेले मुख्य कार्यकारी अधिकारी, लेखक, विचारवंत मा.श्री. इंद्रजीत देशमुख यांनी गुंफले. एक आदर्श पालक म्हणून आई-वडिलांची काय जबाबदारी आहे, आपली प्रत्येक कृतीशील भूमिका काय असली पाहिजे याविषयी विविध उदाहरणे देत देशमुख सरांनी पालकांना मार्गदर्शन केले.

आपल्या पाल्यावर पैसे उधळण्याऐवजी त्यांच्यावर प्रेमाच्या दौलतीची उधळण करा. जोपर्यत तुमच्या लेकरांच्या पंखात बळ येत नाही तोपर्यंत आई-वडिलांचा रोल फक्त त्याला चिअर अप करण्याचा आहे. लोकांच्या किंवा तुमच्या मनाप्रमाणे मुलाला वाढवू नका… त्याचा बोन्साय करु नका, त्याच्या मुळ्या छाटू नका, त्यांच्या फांद्या छाटू नका, जोपर्यत लहान बाळ घडत नाही तोपर्यंत त्यांच्याभोवती कुंपण घाला. तुम्ही फक्त एवढंच सांगा की हे असावं, ते नसावं पण हे सांगताना अगदी सहजतेने सांगा. टी.व्ही., मोबाईल वापरु नका असे सांगताना त्यांनी काय करावे हे त्यांना आपल्या अनुकरणातून दाखवून द्या. बाहेरील आणि घरातील वातावरण परिणामकारक असल्यामुळे हे वातावरण बदलण्याचा प्रयत्न करा. जगाच्या बाजारात तुमचं मूल कोसळेल, धडपडेल पण त्याला हा विश्वास असेल की काहीही झालं तरी माझे आई-वडील माझ्यासाठी असतील. मुलांना गरज आहे ती तुमच्या विश्वासाची आणि प्रेमळ अनुभूतीच्या स्पर्शाची! मुलांना प्रतिक्रियावादी न बनवता प्रतिसाद द्यायला शिकवा. द्वेष आणि तुलनेच्या पाशात न अडकवता मुलांशी विश्वास, प्रेम व जिव्हाळ्याचे बंध जोडायला शिका… अशा मार्मिक पद्धतीने मा. इंद्रजीत देशमुख सरांनी पालकांशी सुसंवाद साधला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सेवानिवृत्त प्राचार्या, लेखिका, विचारवंत, मानसशास्त्रज्ञ मा. डॉ. सुषमा भोसले यांनी भूषविले.

विद्यावाचस्पती पदवी प्राप्त केल्याबद्दल श्री विठ्ठल नायकवडी व सौ. प्रियांका नायकवडी या दाम्पत्यांचा मा. इंद्रजीत देशमुख व अध्यक्ष डॉ. सुषमा भोसले यांच्या शुभहस्ते सृजन फाउंडेशनच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. सृजन फाउंडेशनचे सचिव प्रा. विकास कंद यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्राचार्या डॉ. कविता अय्यर यांनी आभारप्रदर्शन केले. सहशिक्षिका सौ. वृषाली आढाव यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *