Pimpri News : शालेय शिक्षणाबरोबर कौशल्य विकासाचे धडे देणे आवश्यक : केंद्रीय राज्यमंत्री ए.नारायणस्वामी

Pckhabar-देशाला जागतिक स्तरावर कणखर बनविण्यासाठी शालेय शिक्षणाबरोबर कौशल्य विकास शिक्षणासोबत विज्ञानाचे धडे देणे आवश्यक आहे. शालेय वयात मुलांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच कौशल्य विकासाचे धडे देणे अत्यंत गरजेचे असून कोरोना काळात मुले अधिक काळ घरात राहिल्यामुळे त्यांच्या मानसिकतेवर ताण निर्माण झालेला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री ए. नारायणस्वामी यांनी व्यक्त केले.
बाल दिनानिमित्त नॉव्हेल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूल चिंचवड येथे विद्यार्थी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून भारताचे केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री ए.नारायणस्वामी उपस्थित होते. त्यांच्या हस्ते कला, क्रीडा,शैक्षणिक क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या शालेय विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला आमदार महेश लांडगे, सुनील वारे, मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. बी. एन. गायकवाड संस्थेच्या संचालिका नगरसेविका अनुराधा गोरखे व अमोल थोरात उपस्थित होते. याप्रसंगी कला, क्रीडा, शैक्षणिक क्षेत्रांतील प्राविण्य प्राप्त केलेल्या संस्थेतील विद्यार्थी व शिक्षकांचा गौरव करण्यात आला.
राज्यमंत्री ए. नारायणस्वामी म्हणाले, शाळा चालू झाल्यानंतर विद्यार्थ्यांचा ताण कमी करण्यासाठी शिक्षकांनी अथक परिश्रम घेणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबर जास्तीत जास्त क्रीडांगण उपलब्ध करून देणे व त्यातून त्यांची शारीरिक क्षमता वाढविणे महत्त्वाचे राहील. भारत सरकारच्या माध्यमातून विविध योजना व शिष्यवृत्तीचा लाभ जनसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला हवी ती मदत करायला तयार आहे असेही ते म्हणाले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अमित गोरखे यांनी प्रास्ताविक केले.











Leave a Reply