Article By Dr. Ankush Jadhav कोरोना-परतीच्या मार्गावर ?
Pckhabar-गेली वर्षभर जगभर हाहाकार माजविणाऱ्या,
जगाच्या सर्व प्रकारच्या व्यवहारांवर प्रतिबंध आणण्यास भाग पडणारा, सर्वांनाच एकमेकांशी संपर्क कमी करायला लावणारा कोरोना आता परत जाणार का? संपणार का? लक्षणे तर अशीच दिसू लागली आहेत.
कोरोना महासाथीचा पहिला रुग्ण गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात (२०१९) चीन मधील वुहान प्रांतात आढळून आला, भारतात ३०जानेवारी 2020 ला केरळ राज्यात तर महाराष्ट्रात ९ मार्चला २०२० ला कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. कोरोनाच्या महासाथीचा प्रसार, फैलाव होऊ नये, संसर्ग साखळी तुटावी यासाठी भारतात २२ मार्च २०२०च्या मध्यरात्री पासून ताळेबंदी अर्थात लॉकडाऊन सुरू झाला. सुरवातीला ही ताळेबंदी २१ दिवसांसाठी लागू करण्यात आली परंतु पुढे वाढतच गेली. ३१ मे पर्यंत ४ लॉकडाउन झाले. या लॉकडाऊनच्या काळातही रुग्ण संख्या वाढतच गेली. त्यानंतर १ जून पासून शिथिलीकरण अर्थात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली. अजून ही अत्यल्प प्रमाणात अनलॉक सुरूच आहे. मुंबईत आतापर्यंत काही ठराविक कर्मचाऱ्या साठीच असणारी लोकल ट्रेन ठराविक वेळेत सर्वसामान्य लोकांसाठी १ फेब्रुवारी पासून सुरू होत आहे.
भारतात आता कोरोनाची रुग्ण संख्या कमी होत चालली असल्याचे दिसून येत आहे. भारतात आतापर्यंत १ कोटी ७ लाख २०हजार ९७१ कोरोनाबाधित आहेत. (२९ जानेवारी २०२१). त्यापैकी १ कोटी ५ लाखापेक्षा अधिक कोरोनाबाधित बरे झाले असून हे प्रमाण ९७ टक्के आहे. कोरोनामुळे आतापर्यंत १लाख ५४ हजार ४७ इतक्या लोकांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू होण्याचे प्रमाण १.४ टक्के आहे. हेच प्रमाण जून २०२० मध्ये ३.४टक्के होते. जगभर आज ही मृत्यू दर ३ टक्के आहे. जगात आज एकूण १० कोटी २१ लाखापेक्षा जास्त रुग्ण असून त्यापैकी ७ कोटी ३९लाख लोक बरे झालेले असून एकूण २२ लाख पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. कोरोनामुळे जे मृत्यू झाले आहेत. त्या पैकी काहींना पहिल्या पासूनच मधुमेह, हृदय विकार, मूत्रपिंड, कॅन्सर वा अन्य आजार होते. हे प्रमाण ७० ते ७३ टक्के इतके आहे. सध्या देशात १ लाख ७३ हजार पेक्षा अधिक रुग्ण उपचाराधीन आहेत. त्यापैकी०.४६ टक्के व्हेंटिलेटरवर, ३.०२ऑक्सिजनवर तर २.२० टक्के अतिदक्षता विभागात आहेत.
कोरोना रुग्णांची संख्या पुढील प्रमाणे वाढत गेली.
१)७ ऑगस्ट २०लाख.
२)२३ ऑगस्ट ३०लाख.
३)५सप्टेंबर ४०लाख.
४)१६सप्टेंबर ५०लाख.
५)२८सप्टेंबर६०लाख.
६)११ऑक्टोबर ७०लाख.
७)२९ऑक्टोबर८०लाख.
८)२०नोव्हेंबर९०लाख.
९)१७ डिसेंबर-१८हजार.
१०)२९डिसेंबर-१६ हजार
१ जानेवारी २०२१ पासून २१ जिल्ह्यात, १४जानेवारी पासून १८ जिल्ह्यात तर २२ जानेवारी पासून १४६ जिल्ह्यात कोरोनाचा एक ही रुग्ण आढळून आला नाही. गेल्या २४ तासात १२ हजारापेक्षा कमी कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. ब्रिटनमधील नव्या कोरोना ची बाधा झालेले १६५ रुग्ण आहेत. देशातील ३१राज्ये केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोना रुग्ण वाढीचा दर कमी झाला असून सध्या एकूण सक्रिय रुग्णापैकी ७८ टक्के रुग्ण हे केरळ ,उ.प्र., महाराष्ट्र, प. बं. व कर्नाटक या राज्यात आहेत.
डिसेंबर २०१९ मध्ये जेव्हा कोरोना समजला तेव्हा भारतात चाचण्यांसहित सर्व सुविधा मर्यादित होत्या. कोरोनाच्या आजाराची निश्चिती करण्यासाठी मार्च महिन्यात भारतात व दिवसाला फक्त ३०० चाचण्या केल्या जात होत्या. भारताने चाचण्यांची संख्या हळूहळू वाढविली व २२ एप्रिल ला ५ लाख तर ३ मे ला १० लाख चाचण्या केल्या. १७ ऑगस्ट ला ३ कोटी तर २९सप्टेंबर ला ७ कोटी चाचण्या पूर्ण केल्या. आता पर्यंत एकूण चाचण्या १९ कोटी ५ लाख केल्या आहेत.
प्रख्यात साथ रोग तज्ञ डॉ. जयप्रकाश मुदलियार यांच्या मतानुसार, भारतात शहरी ६० टक्के व ग्रामीण भागात ४०टक्के लोकांमध्ये रोग प्रतिकारशक्ती आली की उरलेल्या ना” समूह सरंक्षण” मिळून साथ ओसरेल. सिरो सर्वे मधून स्पष्ट झाले आहे. ऑक्सफोर्ड विद्यापीठाने शोधलेल्या “कॉव्हीशिल्ड” या लशी चे उत्पादन पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ने केले आहे तर पुण्यातील ” नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजि ” ने शोधलेल्या ” कॉव्हक्सिन” लशी चे उत्पादन हैदराबादमधील भारत बायोटेक कंपनी ने केले असून दोन्ही ही लशी ना भारत सरकारने परवानगी दिली असून वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना प्रथम लस देण्याचे काम सुरू झाले आहे. दररोज ३ लाख लोकांना लस देण्यात येत आहे. २६ जानेवारी पासून २८ जानेवारी च्या दुपार पर्यंत एकूण २५ लाख लोकांना लस दिली गेली.
या कोरोना साथीतून एक गोष्ट स्पष्ट झाली ती म्हणजे भारतातील लोकांची रोगप्रतिकारक शक्ती अन्य देशातील लोकांपेक्षा नक्की चांगली आहे आणि म्हणूनच भारतात कोरोनाच्या साथीने लोक जास्त बाधित झाले नाहीत वा अन्य देशांच्या मानाने मृत्यू ही कमी झाले.
कमी होत चाललेली रुग्ण संख्या ही अत्यंत दिलासादायक बाब असली तरी गाफील राहून चालणार नाही. लोकांनी समजूतदार दाखविला पाहिजे.आज बहुतांश लोकांनी मास्क वापरने बंद केले आहे. बरेच लोक लोक शोभेसाठी मास्क घालतात. कारण तो गळ्यातच असतो. लस आली तरी धोका पूर्ण टळलेला नाही म्हणून अंतर राखणे, वारंवार हात धुणे व योग्य प्रकारे मास्क वापरणे यांचा अवलंब अजून सहा महिने तरी करणे आवश्यक आहे. असे केले तर लवकरच जग, भारत कोरोना मुक्त होईल, यात शंका नाही.
डॉ. अंकुश जाधव
नवी मुंबई, इस्लामपूर (सांगली)










Leave a Reply