Article By Madhuri patil: एक आदर्श महिला – सावित्रीबाई फुले

सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
प्रा.पाटील माधुरी सचिन
जिजामाता ज्युनिअर कॉलेज ऑफ एजुकेशन,सातारा
Pckhabar-अज्ञानाच्या अंधारात गुरफटलेल्या समाजाला सुशिक्षित करण्याचा विडा उचलत, मातीच्या धुळपाटीवर ज्ञानाचे मनोरे रचत समाजाला ज्ञानी बनविण्यासाठी पुढे सरसावत स्त्री शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवणार्या त्याचप्रमाणे ज्या काळात स्त्रीला समाजात मानाचे स्थान मिळत नव्हते, शिक्षणापासून आणि स्वातंत्रापासून दूर ठेवून स्त्रीला परावलंबी आणि परतंत्र ठेवले जात होते त्या काळात सावित्रीबाईंचा जन्म झाला. पुढे मात्र सावित्रीबाईना ज्योतिबा फूले यांचा उदार दृष्टीकोण असल्याने स्वत:चे व्यक्तिमत्व घडविण्याची संधि प्राप्त झाली. म्हणूनच आज त्या तळागाळातील लोकांपर्यंत सहजरित्या पोहचल्या गेल्या.
याहीपेक्षा पुढे जावून मला असे सांगावेसे वाटते की सावित्री या शब्दाचा अर्थ सूर्याशी निगडीत आहे. सूर्याची मुलगी सवित्र म्हणजे प्रचंड ऊर्जेचा स्त्रोत आणि निर्माणकर्ता ब्रम्ह देवाच्या
पत्नीचे नावही सावित्री म्हणजे उत्पत्तीचा स्त्रोत आणि एक सावित्री अशीही होती की जिच्या भक्तीने यमलाही माघार घ्यावी लागली. या तिन्ही गुणांनी युक्त असल्येल्या अशा सावित्रीबाई फुले यांना प्रथम विनम्र अभिवादन !कारण आज त्यांच्या मुळेच मी आणि माझ्या सारख्या असंख्य शिक्षिका भगिनी लिहतता , वाचतात, एव्हडेच नव्हे तर स्वता:चे अस्तित्व सिद्ध करू शकल्या.
जसे विवेकानंद यांना एक युगपुरुष म्हणून सबोधले जाते तसेच सावित्रीबाई फुले यांना शिक्षणाची क्रांति घडविणारी एक ज्योत जीने स्त्री जन्माचे जीवनच प्रकाशने उजळून टाकले अशी क्रांतीज्योती असे संबोधले जाते. सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवलीच पण त्याचबरोबर सामाजिक कार्यातही त्यांनी जोखून देवून कार्य केले. हे सर्व त्या पतीच्या पावलावर पाऊल टाकून अंधपणे करीत नव्हत्या तर त्यांची त्या कार्यावर निष्ठा होती म्हणूनच. सावित्रीबाईंनी ज्योतीबांच्या सर्व कार्यात हिरीरीने भाग घेतला स्त्रियांनी शिकावे हेच त्यांचे ब्रीद वाक्य होते. अनाथांना आश्रय मिळवा ही त्यांची कार्यक्षेत्र त्यांच्या श्रद्धेने प्रभावी झाली. सामाजिक कार्यात पुढाकार घेणे हे त्यांचे ध्येय होते. याचाच साक्षात्कार म्हणून एका प्रसंगांची जाणीवपूर्वक आठवण करून द्यावीशी वाटते. ती म्हणजे सावित्रीबाई आणि ज्योतिबा यांना अपत्य नव्हते त्यांनी यशवंत नावाचा मुलगा आणि त्याच्या विधवा आईला आपल्या घरी सांभाळले. पुढे सावित्रीबाईंनी ज्योतीबांशी विचारविनिमय करून यशवंतला दत्तक घेतले. आणि यशवंतचे पालनपोषण केले. हाच त्यांचा आदर्श समाजाला दिशादर्शक ठरला म्हणून तर आज कितीतरी अनाथ यशवंतांना डोक्यावर छप्पर आणि मायेची ऊब देणारी माणस मिळाली.
सावित्रीबाईंनी पतीनिधनानंतर त्यांनी सत्यशोधक समाजाचे समता आंदोलन पुढे चालू ठेवले सावित्रीबाई शिकल्या तेव्हा त्याच्या ठायी असणार्या कवीमनाला जे काही आढळलेते त्यांनी कविता आणि अभंगांच्या रूपात शब्द्बद्धही केले. 1854 साली त्यांचा काव्यफुले हा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. मातोश्री सावित्रीबाईंचे भाषणे व गाणी या नावाने पुस्तकही 1891 मध्ये प्रसिद्ध करण्यात आले. कित्येक कवितात निसर्गाची मनोरम वर्णनेही आलेली आहेत. काव्यलेखनाप्रमाणेच त्यांनी गृहिणी या मासिकात लेखही लिहिले त्याच्या लेखनाला स्वानुभवाचा भक्कम आधार असल्याने ते लेखन परिणामकारक झाले आहेत.
सावित्रीबाईसारख्या कमालीच्या धडाडी असणार्या स्त्रीचा, आजच्या काळातील सावित्रीला पाहताना मात्र नक्कीच उर भरून आला असता इतके मिळलेले स्वातंत्र, इतकी हुशार, स्वावलंबी, ध्येयवादी आजची सावित्री प्रत्येक क्षेत्रात आपला झेंडा रोवून तटस्थ उभी आहे हे पाहून अभिमानाचे अश्रू नक्की तरळले असते. पीएन एक खंत प्रकर्षाने जाणवली असती ती म्हणजे समाजात वाढलेले स्त्री भ्रूणहत्या व बलात्काराचे विकृत रोग. यांचा वाढत चाललेला प्रादुर्भाव व स्वसंरक्षणाचा अभाव. स्त्री हे विसरलीय तिच्यातच उत्पती व संहारकरण्याची क्षमता उपजतच आहे. फक्त तिला जाणीव नाही त्याचप्रमाणे ज्ञानाने सावित्रीबाईंनी प्रत्येक प्रसंगाला न घाबरता तोंड दिले तसेच आजच्या आधुनिक शिक्षण पद्धतीचा उपयोग स्वसंरक्षणासाठी प्रतेक स्त्रीने केला तर मग आज सावित्रीबाई फुले यांच्या स्मरणार्थ आपण स्वसंरक्षणाची राखी आपल्यामधील सावित्रीलाच बांधूयात आणि तिला सक्षम अधिक सक्षम बनवूयात शेवटी सावित्रीसाठी एव्हडेच म्हणेन
पडलो, धरपडलो तरीही नाही रडलो …
सावित्री तू होतीस म्हणूनच आम्ही घडलो … म्हणून तर, तूच आहेस आमचा श्वास आणि तूच आहेस आमचा ध्यास..!
प्रा.पाटील माधुरी सचिन
जिजामाता ज्युनिअर कॉलेज ऑफ एजुकेशन ,सातारा










Leave a Reply