Article By Dr. Ankush jadhav : ‘कोरोना आणि वर्षाअखेर’
Pckhabar- गेली वर्षभर न दिसणाऱ्या एका विषाणूने अखिल मानवजातीस वेठीस धरले. काही काळ सर्व जगालाच कुलूपबंद केले. सर्वांनाच एकमेकांशी संपर्क कमी करायला लावणाऱ्या, अर्थ व्यवस्था उद्ध्वस्त करणाऱ्या कोरोना महासाथीचा पहिला रुग्ण गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात (२०१९) चीन मधील वुहान प्रांतात आढळून आला. भारतात ३० जानेवारीला केरळ राज्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला.

कोरोनाच्या महासाथीचा प्रसार, फैलाव होऊ नये, संसर्ग साखळी तुटावी यासाठी भारतात २२ मार्च २०२० च्या मध्यरात्रीपासून ताळेबंदी अर्थात लॉकडाऊन सुरू झाला.
सुरवातीला ही ताळेबंदी
२१ दिवसांसाठी लागू करण्यात आली परंतु पुढे वाढतच गेली. ३१ मे पर्यंत ४ लॉकडाउन झाले. या लॉकडाऊनच्या काळातही रुग्ण संख्या वाढतच गेली. त्यानंतर १ जूनपासून शिथिलीकरण अर्थात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली. अजून ही अत्यल्प प्रमाणात अनलॉक सुरूच आहे.
ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या नव्या कोरोनामुळे जगभर भीतीचे वातावरण निर्माण झाले असताना भारतात मात्र आता कोरोनाची रुग्ण संख्या कमी होत चालली असल्याचे दिसून येत आहे. भारतात आतापर्यंत १ कोटी २लाख २४हजार ३०३ कोरोनाबाधित आहेत(२९ डिसेंबर २०२०). त्यापैकी ९८ लाखापेक्षा अधिक कोरोनाबाधित बरे झाले असून हे प्रमाण ९७ टक्के आहे. कोरोनामुळे आतापर्यंत १ लाख ४८ हजार १५३ इतक्या लोकांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू होण्याचे प्रमाण १.४५ टक्के आहे. कोरोनामुळे जे मृत्यू झाले आहेत. त्या पैकी काहींना पहिल्या पासूनच मधुमेह, हृदय विकार, मूत्रपिंड, कॅन्सर वा अन्य आजार होते. हे प्रमाण ७० ते ७३ टक्के इतके आहे. सध्या देशात २लाख ६८ हजार ५८१ रुग्ण उपचाराधीन आहेत. हे प्रमाण एकूण रुग्ण संख्येच्या २.६३टक्के आहे.
कोरोना रुग्णांची संख्या पुढील प्रमाणे वाढत गेली.
१)७ ऑगस्ट २० लाख.
२)२३ ऑगस्ट ३०लाख.
३)५ सप्टेंबर ४० लाख.
४)१६ सप्टेंबर ५० लाख.
५)२८ सप्टेंबर ६० लाख.
६)११ ऑक्टोबर ७० लाख.
७)२९ ऑक्टोबर ८० लाख.
८)२० नोव्हेंबर ९० लाख.
परंतु आता २७ डिसेंबरपासून ही रुग्ण वाढ कमी होत आहे. २७ डिसेंबरला १८हजार झाली. तर २९ डिसेंबरला १६ हजारहून अधिक रुग्ण आढळून आहेत. डिसेंबरमध्ये साधारणतः २० हजार हून कमी रुग्ण आढळून आले.
ब्रिटनमध्ये आढळून आलेला नवीन कोरोना अधिक संसर्गजन्य आहे. परंतु तो फार प्राणघातक नाही असे आतापर्यंत दिसून आले आहे. डिसेंबर २०२० मध्ये जेव्हा कोरोना समजला तेव्हा भारतात चाचण्यांसहित सर्व सुविधा मर्यादित होत्या. कोरोनाच्या आजाराची निश्चिती करण्यासाठी मार्च महिन्यात भारतात दिवसाला फक्त ३०० चाचण्या केल्या जात होत्या. भारताने चाचण्यांची संख्या हळूहळू वाढविली व २२ एप्रिल ला ५ लाख तर ३ मे ला १० लाख चाचण्या केल्या. १७ ऑगस्ट ला ३ कोटी तर २९ सप्टेंबरला ७ कोटी चाचण्या पूर्ण केल्या. आता या चाचण्यांची संख्या १७ कोटी पूर्ण झाल्या आहेत. अमेरिकेत याच चाचण्या २५ कोटी झाल्या आहेत. अमेरिकेतील कोरोनाबधितांची संख्या १ कोटी ९९ लाखांपेक्षा अधिक आहे. तुलनाच करायची झाल्यास अमेरिकेची लोकसंख्या ३५ कोटी आहे तर भारताची १३६ कोटी आहे. अमेरिकेत एका चौ. कि.मी. मध्ये ४० लोक राहतात तर भारतात एका चौ. की. मी.मध्ये ४०५ लोक राहतात. जर या लोकसंख्येच्या घनतेच्या प्रमाणात भारतात कोरोना बधितांची सांख्य वाढली असती तर? परंतु तसे भारतात झाले नाही.
या कोरोना साथीतून एक गोष्ट स्पष्ट झाली ती म्हणजे भारतातील लोकांची रोगप्रतिकारक शक्ती अन्य देशातील लोकांपेक्षा नक्की चांगली आहे आणि म्हणूनच भारतात कोरोनाच्या साथीने लोक जास्त बाधित झाले नाहीत वा अन्य देशांच्या मानाने मृत्यू ही कमी झाले.
कमी होत चाललेली रुग्ण संख्या ही अत्यंत दिलासादायक बाब असून लोक समजदारीने वागले म्हणजे अंतर राखणे, वारंवार हात धुणे व योग्य प्रकारे मास्क वापरणे यांचा अवलंब केला तर लवकरच जग, भारत कोरोना मुक्त होईल, यात शंका नाही. नवीन वर्षात सर्वांचे आरोग्य चांगले राहो!!
नवीन वर्षाच्या सर्व वाचकांना खूप-खूप शुभेच्छा!!
डॉ. अंकुश जाधव
नवी मुंबई, इस्लामपूर(सांगली)










Leave a Reply