Dehu News : नवरात्रोत्सवानिमित्त अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षिकांनी स्त्री शक्तीचा जागर करीत विद्यार्थ्यांना दिले संस्कारांचे अमूल्य धडे

Dehu News : नवरात्रोत्सवानिमित्त अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षिकांनी स्त्री शक्तीचा जागर करीत विद्यार्थ्यांना दिले संस्कारांचे अमूल्य धडे

Pckhabar- श्रीक्ष्रेत्र देहूतील अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील नऊ आदर्श स्त्री भूमिका निवडून शाळेतील शिक्षिकांनी एकपात्री अभिनयातून ती व्यक्तिरेखा विद्यार्थ्यांसमोर हुबेहूब साकारली.

विद्यार्थ्यांनी या स्त्रियांना कधी पाहिले नाही, पण त्यांच्याबद्दल अभ्यासक्रमातून माहिती मिळविलेली आहे. म्हणूनच आत्ताच्या काळात या स्त्रियांना कसे आणायचे? या कल्पनेतून एकपात्री अभिनयाची संकल्पना समोर आली व या सर्व स्त्रिया आत्ताच्या काळाशी संबंधित मुलांवर काय संस्कार करतील? हा विचार पुढे आला. नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी *डॉ.आनंदीबाई जोशी* आणि *राणी लक्ष्मीबाई* आपल्या वेशभूषेत विद्यार्थ्यांसमोर आल्या. डॉ.आनंदीबाई जोशींनी शिक्षणातून आपले डॉक्टर होण्याचे स्वप्न कसे पूर्ण केले हे सांगितले. तसेच पांढऱ्या रंगाचे प्रतिक म्हणून आपले आरोग्य सुदृढ ठेवण्याचा संदेश त्यांनी दिला.

रंग हा धाडस आणि बलिदानाचे प्रतिक समजला जातो, म्हणूनच शूरवीर, धाडसी राणी लक्ष्मीबाई विद्यार्थ्यांना दुसर्‍या दिवशी भेटल्या. आपला रोमांचकारक प्रवास त्यांनी विद्यार्थ्यांसमोर रेखाटला. आजच्या काळात मुलींना धाडसी बनविले पाहिजे, त्यासाठी त्यांना स्व संरक्षणाचे धडे शिकवावे हा धाडसी संस्कार राणी लक्ष्मीबाईंनी विद्यार्थ्यांवर केला.

तिसर्‍या दिवशीचा रंग नीळा… म्हणजे समर्पणाचे प्रतिक. राज्यकारभार सांभाळणे ही केवळ पुरूषांची मक्तेदारी नसून एक स्त्री देखील उत्तम राज्यकारभार सांभाळू शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे *पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर*. समाजाप्रती असलेले ऋण गरजूंना मदत करून आपण फेडले पाहिजे, असा समाजसेवेच्या व्रताचा वसा अहिल्याबाई देऊन गेल्या.

चौथ्या दिवशी पिवळा रंग म्हणजेच वैभव व संपन्नतेचे प्रतिक. विद्यार्थ्यांना विचारांची व नीतीमूल्यांची संपन्नता बहाल करण्यासाठी *संत मुक्ताबाई* आल्या. मुक्ताईने आपल्या काही अभंगांमधून मुलांना विवेकरुपी विचार देऊन गर्भश्रीमंत केले आणि खरी संपन्नता काय? खरे वैभव कोणते? हे सोप्या शब्दात समजावून दिले. पाचवा दिवस म्हणजे हिरवा रंग, निसर्गाचे व चैतन्याचे प्रतिक. या दिवशी *रमाबाई रानडे* मुलांना येऊन भेटल्या. आपल्याला आपल्या जोडीदाराने म्हणजेच महादेव रानडेंनी कसे सक्षम बनविले व आपण एक कायदेतज्ज्ञ कशा झालो? हे रमाबाईंनी मुलांना सांगितले. शिक्षण पूर्ण करून या शिक्षणाचा समाजाच्या कल्याणासाठी वापर करावा ही गोष्ट रमाबाई शिकवून गेल्या.

पहिली महिला शिक्षिका होऊन मुलींच्या शिक्षणासाठी अग्रभागी असणाऱ्या *सावित्रीबाई फुले* मुलांना येऊन भेटल्या.

आजचे शिक्षणाचे प्रचंड व्यापक रुप पाहून त्या हरखून गेल्या. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, ज्ञान आपल्याला नम्रतेची जाणीव करून देते व माणूस म्हणून घडवायला मदत करते यासाठीच शिक्षणाला पर्याय नाही. खूप शिका आणि मोठे व्हा असा आशिर्वादच जणू सावित्रीबाई देऊन गेल्या. अवघ्या महाराष्ट्राच्या आऊसाहेब *राजमाता जिजाऊ* मुलांना येऊन भेटल्या. शिवबाला घडवताना, स्वराज्य स्थापन करताना आपण केलेल्या संस्कारांची शिदोरी छत्रपतींनी कशी शेवटपर्यंत जतन करून ठेवली हे आऊसाहेबांनी मुलांना सांगितले. आपल्या वडीलधारी मंडळींचा म्हणजेच आई, वडील, शिक्षक यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट आपण ऐकली पाहिजे व तसे अनुकरण केले पाहिजे हे आऊसाहेबांनी आपल्या कणखर शब्दांत मुलांना सांगितले. शिक्षण आणि संस्कारांसोबतच गरज असते ती कलेची. कला आपल्याला समृद्ध करते. कलेमुळेच समाजात आपले स्थान निर्माण करणाऱ्या भारताच्या गानकोकिळा, *स्वरसाम्राज्ञी लता मंगेशकर* मुलांना भेटल्या. आपला जीवनपट उलगडताना आपले प्रयत्न जर प्रामाणिक असतील तर आपल्याला यश नक्की मिळतं, हे त्यांनी सांगितले. तसेच अहिराणी भाषेत कविता करुन केवळ कवयित्री म्हणून आपली ओळख निर्माण करणाऱ्या *बहिणाबाई चौधरी* मुलांना येऊन भेटल्या. जे काही करायचे ते मध्येच अर्धवट न सोडता त्याचा पाठपुरावा कसा करावा व जी गोष्ट सगळ्यात चांगली येत असेल ती ने आपले स्थान कसे निर्माण करायचे? हे बहिणाबाईंनी आपल्या अहिराणी भाषेतून मुलांना सांगितले. नऊ दिवस हा शारदीय नवरात्रोत्सव साजरा करत अभंग इंग्लिश मिडीयम स्कूल ने महाराष्ट्रातील या स्त्री शक्तीचा अनोख्या पद्धतीने जागर करुन विद्यार्थ्यांवर संस्कार करण्याचा आपला मानस सफल केला.

स्त्री भूमिका साकारणाऱ्या शाळेतील सहशिक्षिका –
१ . डॉ. आनंदीबाई जोशी – सौ. योगिता नांगरे
२. राणी लक्ष्मीबाई – सौ. प्राची पोटावळे
३. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर – सौ. प्रियंका चव्हाण
४. संत मुक्ताबाई – सौ. मनिषा मदने
५. रमाबाई रानडे – सौ. स्नेहल शिंदे
६. सावित्रीबाई फुले – सौ. वृषाली आढाव
७. राजमाता जिजाऊ – सौ. सुरेखा माळवे
८. लता मंगेशकर – सौ. रोहिणी देशमुख
९. बहिणाबाई चौधरी – सौ. निलिमा अहिरराव
या सर्व सहशिक्षिकांनी आपल्या अभिनयातून हा ज्ञानदानाचा वसा विद्यार्थ्यांसमोर पोहचवला. हा नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी या सर्व शिक्षिकांना अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलच्या प्राचार्या डॉ. कविता अय्यर, सृजन फाऊंडेशनचे अध्यक्ष सुनील कंद व सचिव प्रा. विकास कंद सर यांनी मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *