Chinchwad News : जीवनशैलीतील बदलामुळे मुलींना मासिक पाळी येण्याचे वय कमी होतेय- वैशाली श्रीमंडल

अरविंद एज्युकेशन सोसायटीत मासिक पाळी व्यवस्थापन संदर्भात विद्यार्थिनींना मार्गदर्शन
pckhabar-सध्याची बदलती जीवनशैली, खाण्याच्या चुकीच्या सवयी, ताण-तणाव यामुळे मुलींचे पहिली पाळी येण्याचे अर्थात ऋतूप्राप्तीचे वय खालावत चालले आहे. त्यामुळे किशोरवयीन मुलींनी आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करून काळजी घ्यावी, असे आवाहन आर्ट ऑफ लिव्हिंग अंतर्गत पवित्र प्रोजेक्टच्या शिक्षिका वैशाली श्रीमंडल यांनी केले.
जुनी सांगवी येथील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या वतीने 8 ते 13 वर्षे वयोगटातील विद्यार्थीनींसाठी आयोजित मासिक पाळी व्यवस्थापन संदर्भात मार्गदर्शन कार्यशाळेत त्या बोलत होत्या. यावेळी अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा आरती राव, मुख्याध्यापिका, शिक्षिका आदी उपस्थित होते.
या कार्यशाळेत वैशाली श्रीमंडल यांनी किशोरवयीन मुलींना ऋतुप्राप्ती झाल्यानंतर पौगांडावस्थेतील होणारे शारीरिक व मानसिक बदल, मासिक पाळी व्यवस्थापन, मासिक पाळी विषयी समज गैरसमज, स्वच्छता, मासिक पाळीशी संबंधित विविध आरोग्य समस्या, व्यायाम, योगासने, तसेच सॅनिटरी नॅपकिन वापरण्याची व त्याची योग्य विल्हेवाट लावण्याची पद्धती याविषयी माहिती देऊन पोषक आहार व व्यायाम याबाबत मार्गदर्शन केले.
संस्थेच्या अध्यक्षा आरती राव म्हणाल्या, मासिक पाळीविषयी विद्यार्थिनींना माहिती देण्यासाठी शाळेत वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत. वयात येणार्या विद्यार्थिनींना मासिक पाळी म्हणजे काय, इथपासून ते सॅनिटरी नॅपकिन कसे वापरावे, त्याची योग्य विल्हेवाट कशी लावावी, याविषयी आम्ही उपक्रम राबवीत आहोत. समज-गैरसमज दूर होऊन याविषयी मुक्तपणे बोलले जावे, हा यामागील प्रमुख उद्देश आहे.










Leave a Reply