Talegaon Dabhade News :  घर, शाळा, विद्यालय, महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी लिसनिंग सेशन ठेवण्याची गरज : सलील कुलकर्णी

Talegaon Dabhade News :  घर, शाळा, विद्यालय, महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी लिसनिंग सेशन ठेवण्याची गरज : सलील कुलकर्णी

Pckhabar- आपण पाल्यांकडे ओझं म्हणून पाहू नका, तर संधी म्हणून पहा. घर, शाळा, विद्यालय, महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी लिसनिंग सेशन ठेवता येईल का? याचा विचार होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध संगीतकार, गीतकार, चित्रपट दिग्दर्शक सलील कुलकर्णी यांनी केले.


ते आज इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या वतीने आयोजित ‘शिक्षक दिन कृतज्ञता समारंभ’ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कांतीलाल शहा विद्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे, खजिनदार शैलेशभाई शहा, संस्थेचे विश्वस्त विलास काळोखे, सदस्या निरूपा कानिटकर, डॉ. शाळीग्राम भंडारी, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष माजी नगरसेवक चंद्रभान खळदे, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य युवराज काकडे, संजय वाडेकर, माजी विद्यार्थी दशरथ जांभुळकर, प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, बी. फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय आरोटे, डी. फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य जी. एस. शिंदे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना सलील कुलकर्णी म्हणाले, मातृ-पितृ दिना प्रमाणेच शिक्षक दिनही महत्त्वाचा आहे. आपण कुठेही भेटा, लगेच आपण शिक्षकांच्या पुढे नतमस्तक होतो. गुणांची खरी पारख शिक्षकांनाच करता येते. शिक्षक जेव्हा बोलायला लागतो, तेव्हा तो स्टोरी टेलिंगच करत असतो. तो आपले दुःख बाजूला ठेवून प्रत्यक्ष शिकवत असतो, म्हणून मला शिक्षक वंदनीय वाटतात. ‘एकटी एकटी घाबरलीस ना आई…’ या गाण्याची निर्मिती प्रक्रिया सांगताना जगण्यातले गाणे काय असते, हे कुलकर्णी यांनी उलगडून दाखवले. प्रसंग वाईट असतात, त्यांच्याशी कसा सामना करायचा हे आपल्याला जमले पाहिजे. मुलांचे मानसशास्त्र आपल्याला समजून घेता आले पाहिजे. त्यांचा हिरमोड करू नका. चांगले शिक्षक हे ‘बेस्ट कौन्सलेलर ‘ असतात, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
अध्यक्षीय भाषणात रामदास काकडे म्हणाले, की ‘ज्या शिक्षकांनी तन- मन- धन अर्पण करून काम केले, त्यांच्या प्रती कृतज्ञता म्हणून आज ‘शिक्षक दिन’ साजरा होत आहे. नालंदा, तक्षशिलासारखी जी विद्यापीठे होती, तेथे संपूर्ण भारतातून शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी येत असत. खगोलशास्त्र व इतर शास्त्रांच्या शोधासाठी भारताचे नाव अग्रक्रमाणे घेतले जाई. या महाविद्यालयात शिकणारा विद्यार्थी हा खणखणीत नाण्यासारखा असावा, यासाठी आपल्याला खूप कष्ट घ्यावे लागतील, ते पेलण्याची क्षमता आपल्यात असावी, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली. शिक्षण पद्धतीत आज खूप आमुलाग्र बदल झालेले आहेत. संशोधन आणि शिक्षण यांचा ताळमेळ घालता आला पाहिजे. यावेळी इंद्रायणी महाविद्यालयात ॲनिमल हाऊस उभे करण्यासाठी 25 लाखांचा निधी मंजूर केल्याची घोषणाही त्यांनी केली.
यावेळी उत्कृष्ट शिक्षकांचा गौरव करण्यात आला. यामध्ये प्रा. के. डी. जाधव, प्रा. आर. एस. भुजबळ, डॉ. एस. के. सानप, शिल्पा पचगल, राजाराम खुने, विनायक गायकवाड, प्रा. राहुल जाधव, प्रा. शाम आवटे, प्रा. एम.एम. देशमुख, प्रा. ए. आर. जाधव, डॉ. पी. एस. बोराडे; तसेच शिक्षकेतर कर्मचारी किशोर शेवकर, विजय मावळकर, मोनाली चासकर, अमोल कांबळे, बाळू वैद्य, सुवर्णा गोरे, देवकुमार ओव्हाळ, गायत्री हिंगे आदींचा गौरव करण्यात आला.
संस्थेचे खजिनदार शैलेश शहा यांनी प्रास्ताविक केले, तर पाहुण्यांचा परिचय प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी करून दिला. यावेळी प्रमुख अतिथींना दिलेल्या मानपत्राचे वाचन कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. ए. आर. जाधव यांनी केले. मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
सूत्रसंचालन प्रा. दीप्ती कन्हेरीकर, प्रा. संदीप भोसले यांनी, तर आभार बी. फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय आरोटे यांनी मानले.

——

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *