Dehugaon News : पाश्चिमात्य देश बाह्य सुखावर भर देतात तर भारत आत्मिक सुखाला प्राधान्य देतो: ब्रिगेडियर डाॅ.सुनिल बोधे
सृजन फाउंडेशनच्या अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी सोहळा उत्साहात साजरा
ब्रिगेडियर डाॅ.सुनिल बोधे यांनी कंद परिवाराचे केले कौतुक
Pckhabar- श्रीक्षेत्र देहू येथील सृजन फाउंडेशनच्या अभंग इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी सोहळा अगदी उत्साहात व देशप्रेमाने ओतप्रोत भरलेल्या वातावरणात साजरा झाला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ब्रिगेडियर डाॅ. सुनिल बोधे व त्यांच्या पत्नी सौ. सुनिता बोधे उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना सर म्हणाले की, कंद परिवाराने वारकरी संस्थेबरोबरच श्रीक्षेत्र देहू परिसरात संस्काराचे पेरणी करणारे एक आदर्श इंग्लिश मिडीयम स्कूल उभारले. याबाबत कंद परिवाराचे त्यांनी कौतुक केले. आपल्या वक्तव्यातून सरांनी १८५७ च्या उठावापासून ते आजतागायतची स्वातंत्र्य लढ्याची गाथा प्रस्तुत केली. यात प्रामुख्याने उल्लेख केला तो स्वामी विवेकानंदांच्या नूतन भारत विचारांचा. पाश्चिमात्य देश बाह्य सुखावर अधिक भर देतात पण भारत आत्मिक सुखाला प्राधान्य देतो. कोरोनाच्या संकटाला आपण हिमतीने सामोरे गेलो. याकाळात एक गोष्ट सर्वांना कळली ती म्हणजे सगळं ऑनलाईन होऊ शकतं पण दोन गोष्टी कधीच ऑनलाईन होऊ शकत नाहीत, त्या म्हणजे एक देशाचं रक्षण आणि दुसरे कधीही काहीही कमी पडू न देणारा आपला बळीराजा. म्हणून पालकांनी आपल्या मुलांना शेतकरी आणि सैनिक बनविण्याचे स्वप्न उरी बाळगले पाहिजे. आपल्या मुलांना अधिकारी बनविण्यापेक्षा शेतकरी बनवले पाहिजे. सोशल मिडीया, मोबाईल, संगणक यांच्या वापरावर पालक म्हणून आपले नियंत्रण ठेवले पाहिजे. यावेळी सरांनी विद्यार्थ्यांशी प्रश्नोत्तरातून संवाद साधत सैन्यात भरती होण्यासाठी कोणती तयारी करावी याबाबत मुलांना मार्गदर्शन केले. आपली शारिरीक क्षमता वाढवणे, अभ्यास करणे, व्यावहारिक ज्ञान प्राप्त करणे, बसमध्ये बसणारा पॅसेंजर न होता सतर्क राहणारा ड्रायव्हर व्हावे अशा आवश्यक गोष्टी सरांनी नमूद केल्या.
युद्धातील अविस्मरणीय प्रसंगाची विचारणा झाल्यावर आपल्या शहीद झालेल्या सहका-याची आठवण येऊन सर भाऊक झाले. एक चारित्र्यसंपन्न, जबाबदार देशाचे नागरिक बनण्याचे ध्येय बाळगा अशी शिकवण सरांनी मुलांना दिली. शाळेच्या प्राचार्या डॉ. कविता अय्यर, सृजन फाउंडेशनचे कायदेशीर सल्लागार ॲड.संजय भसे, जेष्ठ नागरिक व प्रगतीशील शेतकरी श्री.भागुजी काळोखे यांच्या हस्ते ब्रिगेडियर डाॅ. सुनिल बोधे सरांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला.
यावेळी इ. चौथीतील विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत सादर केले. तर इ. तिसरीतील विद्यार्थ्यांनी झेंडागीत सादर केले. इ. चौथीतील अथर्व माने व विराज मोरावले यांनी आपल्या भाषणातून स्वातंत्र्याविषयीच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. इ.पहिली व दुसरीतील विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर समूहगीत सादर केले. शाळेच्या प्राचार्या डॉ. कविता अय्यर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
यावेळी इ. चौथीतील विद्यार्थ्यांच्या राखी विक्री उपक्रमाचे मॅडमने कौतुक केले. राखी विक्रीतून जमा झालेल्या नफ्याची रक्कम कार्यक्रमाचे मुख्य अतिथी ब्रिगेडियर डॉ. सुनील बोधे यांच्या हस्ते शाळेतील गरजू विद्यार्थी कुमार रेहान शेख याच्या हाती सुपूर्त करण्यात आली. सृजन फाउंडेशनचे सचिव प्रा. विकास कंद यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी श्री. सोमनाथ मुसुडगे, श्री. शिवाजी टिळेकर, श्री. उमेश हगवणे आदि मान्यवर उपस्थित होते. प्राथमिक विभागाच्या पर्यवेक्षिका सौ. शैलजा स्वामी मॅडम, पूर्व प्राथमिक विभागाच्या पर्यवेक्षिका सौ. सुब्बलक्ष्मी पाठक तसेच सर्व शिक्षकवृंद या सोहळ्यात सहभागी झाले होते.
सहशिक्षिका सौ. प्राची पोटावळे व सौ. वृषाली आढाव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सहशिक्षिका सौ. मिनल धुमाळ यांनी आभारप्रदर्शन केले. या सोहळ्यासाठी बहुसंख्येने पालकांनी हजेरी लावली. सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करुन हा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन जल्लोषात साजरा करण्यात आला.











Leave a Reply