Nigdi News : त्रिवेणीनगर ते तळवडे रस्त्याची दुरवस्थेमुळे वाहतूक समस्या

Nigdi News : त्रिवेणीनगर ते तळवडे रस्त्याची दुरवस्थेमुळे वाहतूक समस्या

तुटलेल्या चेंबर्समुळे आणि खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांचे अपघात

रस्त्याच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी शिवयोद्धा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल भालेकर यांचे महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन

Pckhabar- त्रिवेणीनगर चौक ते तळवडे गाव या मुख्य रस्त्याची खूप दुर्दशा झाली असून हा रस्ता अपघातांना आमंत्रण देणारा झाला आहे. या रस्त्यावर आजपर्यंत अनेक अपघात झाले आहेत, काही जीवघेणे सुध्दा ठरले आहेत. काही दिवसांपूर्वी या मार्गावर दोन गंभीर अपघात झाले आहेत. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असून एकाच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली आहे.
या रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी शिवयोद्धा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल भालेकर यांनी केली आहे.

याबाबत भालेकर यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की,
त्रिवेणीनगर चौक ते तळवडे गाव या मुख्य रस्त्याची खूप दुर्दशा झाली आहे. या रस्त्याची मुख्य समस्या म्हणजे असमतल डांबरीकरण आणि तुटलेले स्टॉर्म वॉटर चेंबर. तुटलेल्या चेंबर्समुळे आणि त्याठिकाणी झालेल्या खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांचे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच पाठीचे, मणक्याचे आजार होण्याची शक्यता आहे. वाहनांचे नुकसान होऊन नागरिकांना आर्थिक, मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. तळवडे IT पार्ककडे जाणारा हा महत्त्वाचा रस्ता असुन यामुळे शहराची प्रतिमा खराब होत आहे. असमतल डांबरीकरणामुळे वाहने घसरून जीव जाण्याचे प्रसंगसुद्धा घडले आहेत. आता पावसाळ्याला सुरुवात होणार आहे. त्यामुळे हा रस्ता त्वरित दुरुस्त करावा.

या रस्तावरील दुभाजकातून असलेले छेद रस्ते ठिकठिकाणी बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना मोठा वळसा घालून जावे लागत आहे. परंतु काही वाहनचालक विरुद्ध दिशेने वाहन चालवून स्वतःसह इतरांचा जीव धोक्यात घालत आहेत, शहराचे प्रशासक म्हणून आपण या सर्व बाबींवर गांभीर्याने विचार करून कार्यवाही करावी, अशी मागणी अमोल भालेकर यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *