Mumbai News : नववर्षाचे स्वागत उत्साहाने, आरोग्यभान राखत संयमाने करा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन
Pckhabar- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला 2022 नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. येणारं नवीन वर्ष राज्यातील जनतेला विकासाच्या नवनवीन संधी उपलब्ध करून देणारं, महाराष्ट्राला सर्वांगीण प्रगतीच्या, संपूर्ण कोरोनामुक्तीच्या वाटेवर घेऊन जाणारं ठरेल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात व्यक्त केला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात की, मावळतं २०२१ वर्ष अनेक संकटांना, आव्हानांना घेऊन आलं. मात्र, महाराष्ट्रवासियांची एकजूट आणि निर्धाराच्या बळावर आपण या आव्हानांचा यशस्वी मुकाबला केला. महाराष्ट्राची ही एकजूट यापुढेही कायम ठेवायची आहे. राज्य आणि देशासमोर ओमायक्रॉनचा धोका आणि कोरोनारुग्णांची वाढती संख्या हे नवीन आव्हान नववर्षाच्या सुरुवातीलाच उभं राहिलं आहे. कोरोना प्रतिबंधक नियमांचं आणि आदर्श कोरोना आचारसंहितेचे पालन करून आपण या संकटावर लवकरच विजय मिळवू, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.
कृषी, उद्योग व्यापार, शिक्षण, सहकार, कला, क्रीडा, साहित्य, संस्कृती, सामाजिक सुधारणा अशा अनेक क्षेत्रात महाराष्ट्र नेहमीच देशात अव्वल राहिला आहे. महाराष्ट्राचं हे अव्वल स्थान कायम ठेवण्यासाठी आपण सर्वांनी पुन्हा एकदा दृढसंकल्प होऊया, असं सांगतानाच नववर्षाचे स्वागत उत्साहाने मात्र आरोग्यभान राखत संयमाने करा, असं आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.










Leave a Reply