Interview With Rasika Kalokhe : ’80 टक्के समाजकारण, 20 टक्के राजकारण या तत्वानुसार कार्यरत’

Interview With Rasika Kalokhe :
’80 टक्के समाजकारण, 20 टक्के राजकारण या तत्वानुसार कार्यरत’

प्रभाग 2 मधील जनता भरघोस मतांनी विजयी करेल, रसिका स्वप्निल आप्पा काळोखे यांचा विश्वास

Pckhabar- 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण या तत्वानुसार माझे पती स्वप्निल आप्पा काळोखे देहूगावमध्ये राजकीय जीवनात काम करतात. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मीही मार्गक्रमण करत आहे. प्रभाग क्रमांक 2 मधील मायबाप जनता निवडणूकीत चांगल्या मताधिक्याने
निवडून देतील. पतीच्या भक्कम पाठबळावर प्रभागात विविध विकास कामे करण्याचा आपला मानस आहे. प्रभाग क्रमांक 2 हा एक ‘आदर्श प्रभाग’ म्हणून ओळखला जाईल, असा आपला प्रयत्न असणार असे सांगत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार रसिका स्वप्निल आप्पा काळोखे…!

1) प्रश्न- आपल्या समाज कार्याची सुरुवात कशी झाली?

उत्तर-लग्नापूर्वी माहेरी वडीलांचे काम आणि लग्नानंतर सासरी पतीचे आदर्श समाजकार्य पहात मीही समाजकार्यात सहभाग घेण्यास सुरुवात केली. पतीच्या सामाजिक, राजकीय जीवनात घर, परिवार पाहत पती स्वप्निल आप्पांना मदत केली. तसेच श्री महालक्ष्मी महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे संघटन केले.

2) प्रश्न- घरातच राजकीय पार्श्वभूमी आहे , आपण प्रथमच निवडणूक लढवीत आहात, याबद्दल काय सांगाल?

उत्तर-निवडणूक ही वैयक्तिक मला जरी नवीन असली तरी मी सातत्याने निवडणूक प्रक्रिया बघत आहे. समाजकार्य बघत बघत लहानची मोठी झाले. प्रभागातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे प्रथम निवडणूक लढवित आहे, असे वाटत नाही.

3) तुमचे पती स्वप्निल आप्पा काळोखे भाजपमध्ये होते. अचानक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला? याबाबत काय सांगाल?

उत्तर- माझे पती समाजकार्य करत आहेत. कालपर्यंत त्यांनी अनेक समाज उपयोगी कामे केली आहेत. भविष्यातही त्यांना काम करायचेच आहे. पण सध्या देहूमध्ये विकास कामाचा जो वेग आहे, तो मावळ विधानसभेचे आमदार सुनिल आण्णा शेळके यांच्यामुळे वाढला आहे. देहूगाव, विठ्ठलवाडी परिसराचा आणखी चांगला विकास व्हावा, या हेतूने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा माझ्या पतीने निर्णय घेतला. विकास कामे करण्यासाठी आमदार सुनिल अण्णांच्या माध्यमातून प्रशासनाचे सहकार्य मिळणार आहे. त्यामुळेच माझे पती स्वप्निल यांनी योग्य निर्णय त्यांनी घेतला आहे, यावर माझा ठाम विश्वास आहे.

4) प्रश्न- तुमचे पती स्वप्निल आप्पा काळोखे यांनी उपसरपंच म्हणून चांगले कार्य केले आहे. त्यांच्याकडून आपण काय प्रेरणा घ्याल.

उत्तर- माझे पती स्वप्नील आप्पा रात्रंदिवस, स्वतःचा, कुटुंबाचा विचार न करता समाजिक बांधिलकी जोपासत समाजासाठी काम करतात. कोरोनाच्या जागतिक महामारीत प्रभागातील अनेक गरजू नागरिकांना मदत केली. नागरिकांमध्ये कोरोनाच्या सुरूवातीच्या काळात प्रचंड भितीचे वातावरण होते. त्यावेळी स्वप्निल आप्पांनी रस्त्यावर उतरून जनजागृती केली. देहू कोविड सेंटरमधील रुग्णांसाठी औषधे, चाचणी कीट, फळे आदींची मदत केली. या काळात स्वप्निल आप्पांना कोरोनाची लागण झाली. मात्र, त्यावर मात करून त्यांनी पुन्हा आपले समाजकार्य सुरूच ठेवले. त्यामुळे माझे पती स्वप्निल आप्पांचे हेच काम माझ्यासाठी प्रेरणादायी आहे.

5) प्रश्न- यापुर्वी देहूगाव ग्रामपंचायत होती. आता नगरपंचायत झाली आहे. मात्र, देहूत अनेक प्रश्न आहेत. याबाबत काय सांगाल?

उत्तर- कोणतेही गाव झपाटयाने वाढते, नागरिकरण दिवसेंदिवस वाढत जाते. तेव्हा समस्या आणि प्रश्न वाढणे साहजिक आहे. पण त्या सोडवणारे लोकप्रतिनिधी मात्र धडाडीने, अभ्यासूपणाने, सक्षमपणे सोडवणारे हवे. मला आणि माझे पती स्वप्नील आप्पा यांनी उपसरपंच म्हणून चांगले काम केले आहे. त्यांच्या अनुभवाचा विकास कामे करताना मला नक्कीच लाभ होणार आहे. त्यांची खंबीर साथ, आणि मार्गदर्शन कायम पाठीशी आहे.

6) प्रश्न-कोणते व्हिजन घेऊन निवडणूकीला सामोरे जात आहात?

उत्तर- देहूगाव हे तीर्थक्षेत्र आहे. जगदगुरु संत तुकाराम महाराज यांची पवित्र भूमी आहे. जगाच्या पटलावरील तुकोबारायांची तत्वभूमी आहे. देहूगावात दरवर्षी संत तुकाराम महाराज यांच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह आदी भागातून लाखो भाविक, वारकरी येतात. या भाविकांसाठी चांगल्या प्रकारच्या सुविधा देण्यास प्राधान्य असेल. प्रभागातील नागरिकांसाठी मुलभूत सुविधांसह विविध विकास कामे आणि देहूचा सर्वांगीण विकास हेच आपले व्हिजन असणार आहे.

7) प्रश्न- निवडून आल्यानंतर कोणती विकासकामे प्राधान्याने करणार?

उत्तर- प्रभाग क्रमांक 2 मधील जनतेसाठी विविध विकास कामे करणार असून एक आदर्श प्रभाग निर्माण करणार आहे. कचरा व्यवस्थापन, स्वच्छता आणि पाणी नियोजनाला आपले प्राधान्य असणार आहे.

8) प्रश्न-एक महिला म्हणून राजकारणात येताना काय वाटते?

उत्तर- आज सर्वच क्षेत्रात महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. राजकारणातही दिवसेंदिवस महिला यशस्वी होत असून उच्च पदावर काम करत आहेत. त्यामुळे राजकारणात येत असताना महिला म्हणून काम करण्यासाठी संधी मिळणार आहे. याचा आनंद होत आहे.

9) प्रश्न-निवडून आल्यानंतर महिलांचे कोणते प्रश्न सोडविण्यावर आपला भर असेल?

उत्तर- महिलांच्या आरोग्याकडे लक्ष देणार. महिलांनी फक्त चुल आणि मुल याचा विचार न करता आपली आर्थिक प्रगती कशी होईल. कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी लहान मोठा उद्योग, व्यवसाय करण्यास प्रोत्साहन देणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *