Chinchwad News : कोकण विकास महासंघाकडून पुरग्रस्त भागात जीवनावश्यक साहित्य व आर्थिक सहाय्य

Chinchwad News : कोकण विकास महासंघाकडून पुरग्रस्त भागात जीवनावश्यक साहित्य व आर्थिक सहाय्य
Pckhabar- मागील पंधरा दिवसात कोकण भागात रत्नागिरी, महाड, खेड, चिपळूण परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक गावात, वाडी – वस्तींवर पडझड होऊन येथिल नागरीकांची घरे उध्वस्त झाली आहेत. हजारो कुटूंबियांचा संसार उध्वस्त झाला आहे. या पुरग्रस्त कुटूंबियांना पिंपरी चिंचवड शहरातील नागरीकांनी मदतीचा हात द्यावा असे आवाहन कोकण विकास महासंघाचे संस्थापक अध्यक्ष कैलास कदम यांनी केले होते.

शहरातील बहुतांशी नागरीकांनी कैलास कदम यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अवघ्या पाच दिवसात हजारो रुपयांचा निधी जमा झाला. या जमलेल्या निधीतून जीवनावश्यक वस्तूंचे सुमारे 450 किट करण्यात आले. उर्वरित रोख रक्कमेतून काही कुटूंबियांना कोकण विकास महासंघाच्या पदाधिका-यांच्या हस्ते रोख अर्थसहाय्य करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. हे सर्व साहित्य घेऊन शुक्रवारी रात्री चार टेंम्पोसह महासंघाचे निवडक पदाधिकारी चिपळूण, रायगड, महाड, खेड मधिल पुरग्रस्त भागात रवाना झाले आहेत.

या मदत पथकात माजी नगरसेवक सद्‌गुरु कदम, कॅ. श्रीपत कदम, अशोक कदम, विजय आंब्रे, राजेश दळवी, संजय उत्तेकर, अनंत साळवी, दिपक पवार, अमृत जाधव, प्रा. गणेश गोरीवले, रुपेश मोरे, अरुण यादव, अवधूत कदम, कृष्णा यादव, वसंत पवार आदींचा समावेश आहे. या किटमध्ये दोन ब्लॅंकेट, दोन टॉवेल, दोन साड्या, दोन परकर, दोन टी-शर्ट, दोन बरमूडा, गाऊन, दोन चप्पल जोड, वाफेची मशिन, सॅनिटायझर व पाच मास्क याचा समावेश आहे. शुक्रवारी महाड, साखर – सुतारवाडी, पोलादपूर, पोसरे, धामनंद, बिरमणी या गावांमध्ये साहित्यांचे किट व बावीस कुटूंबियांना रोख अर्थसहाय्य कोकण विकास महासंघाकडून करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *