लिटिल बॉयची पंचाहत्तरी !

लिटिल बॉयची पंचाहत्तरी !
 (डॉ. अमित नेमाणे)

  Pckhabar- आज 6 ऑगस्ट, याचदिवशी 75 वर्षांपूर्वी जपानच्या हिरोशिमा या शहरावर अमेरिकेने अणुबाँबचा हवाई हल्ला केला होता. ’लिटिल बॉय’ असे या ऑपरेशनला नाव अमेरिकेने दिले होते. या ’लिटिल बॉय’ने जपानचे कंबरडेच मोडले. मानवी इतिहासात कृत्रिमरीत्या अणु हल्याची ही पहिलीच वेळ होती. जुलै महिन्याच्या मध्यार्धात या लिटिल बॉयची अणुचाचणी अमेरिकेने केली होती आणि  अणु हल्यापूर्वी अमेरिकेने इंग्लंडला देखील या हल्याची पुर्वकल्पना दिली होती.  दुसर्‍या महायुद्धाची सांगता या आणि त्यानंतरच्या आणखी एका अणुबाँबने झाली. 15 ऑगस्ट 1945 ला जपानने युद्धात माघार घेतली आणि दुसर्‍या महायुद्धात इंग्लंड, अमेरिका, रशिया, फ्रान्स या मित्र राष्ट्रांचा विजय झाला. पुढे हाच 15 ऑगस्ट विजय दिवस असल्याने ब्रिटिशांनी देखील भारताला 1947 मध्ये स्वातंत्र्य देताना 15 ऑगस्टची निवड केली.
     दुसर्‍या महायुद्धात अणुबाँब हल्यानंतर जपानची अपरिमित हानी झाली. साधारणता या हल्ल्यामुळे 70 ते 80 हजार लोक तात्काळ मृत्युमुखी पडले आणि लाखो लोकांचा पुढील तीन ते चार महिन्यात बळी गेला, प्रचंड रोगराई पसरली. जणुकीय आजारांनी जपानची पाठ पकडली तिला आजवर सोडली नाही. ’लिटिल बॉय’ची संहारकता इतकी प्रचंड होती की बॉम्बचा विस्पोट झाल्यानंतर जी माती, धूर आणि आगीचे लोट हवेत तयार झाले त्याने सकाळची वेळ असून देखील मध्यरात्री सारखा दाट काळोख तेथे दाटला. काळा पाऊस देखील पडल्याचे काही लोकांचे म्हणणे आहे. प्रचंड ऊर्जा असलेले जपान सारखे राष्ट्र, त्यातील हिरोशिमा शहर काही सेकंदात बेचिराख झाले होते. जिकडेतिकडे रक्ताचे थारोळे पडले होते काहीच समजेनासे झाले होते.
    6 ऑगस्टची सकाळ जपानी लोकांसाठी इतर दिवसांसारखीच झाली होती. मागील पाच ते सहा वर्ष दुसरे महायुद्ध निरंतर चालूच होते. त्यातल्या त्यात 1942 पासून जपानमध्ये प्रचंड आक्रमकतेने युद्ध लढले जात होते .दुसर्‍या महायुद्धाच्या दरम्यान जपानने अनेक भूभाग लाटले होते. अगदी आजचा कोरियापासून ते भारताच्या पूर्वी सीमेपर्यंत जपानचे सैन्य आले होते असे म्हणतात. जर आणखी एक ते दोन वर्ष हे युद्ध चालले असते तर भारत (जो त्याकाळी ब्रिटिश राजवटीखाली होता) देखील जपानच्या ताब्यात गेला असता. दक्षिण आशियातील जवळपास 70 टक्के भूभागावर जपानने कब्जा मिळविला होता. या युद्धात अमेरिका सुरुवातीला तितकी सक्रिय नव्हती. परंतु बलाढ्य अमेरिका आपल्यावरती हल्ला करेल या भीतीने जपानने अमेरिकेच्या मालकीच्या एका बेटावरील हंबन्टोटा बंदरावर  प्रचंड बॉम्बहल्ला केला त्यात हजारो अमेरिकी सैन्य दगावले. अमेरिकन संपत्तीची देखील मोठ्या प्रमाणावर हानी झाली आणि जपानच्या याच कृत्याचा बदला घेण्यासाठी अमेरिकेने जपानवर युद्ध पुकारल. परंतु अनेक वर्ष हे युद्ध चालू होते. जपान सारखा चिवट लोक प्रवृत्तीचा देश काही हार मानत नव्हता, असेच युद्ध बराच काळ चालू राहिले तर जपानच्या सैन्याबरोबर अमेरिकेचे सैन्यदेखील मृत्युमुखी पडणार याची कल्पना अमेरिकेला आली होती. त्यात जपानने शेवटचा जपानी नागरिक जिवंत असेपर्यंत लढत राहण्याचे धोरण अंगीकारले होते, अशा परिस्थितीत जपान शत्रू राष्ट्रांचे प्रचंड नुकसान करू शकत होता, या परिस्थिती जपानला तात्काळ नमविण्याचे काम केवळ अणुबॉम्बच करू शकेल अशा मताशी अमेरिका येऊन ठेपली, हे या अणुबाँब हल्यामागील अनेक कारणांपैकी असलेले एक कारण होय.
       तसा दुसर्‍या महायुद्धात जपान, अमेरिका रशिया यांसारख्या युरोपेत्तर राष्ट्रांचा तसा थेट संबंध नव्हता. परंतु जागतिक राजकारणात मित्राचा शत्रू हा आपला शत्रू मानण्याची परंपरा असते. त्यानुसार युरोपातील दोन छोट्या देशांत उडालेली ही ठिणगी संपूर्ण जगात वणव्यासारखी पसरली होती आणि त्याचा शेवट हा हिरोशिमा-नागासाकी सारख्या जपानी शहरांना त्याची किंमत देऊन मोजला होती. अणुहल्यानंतर अमेरिकेचे लष्कर प्रमुख देखील हळहळले होते असे म्हणतात, इतका संहारक हा हल्ला होता.
      मुळात त्याकाळी अणुबाँब असलेले एकमेव राष्ट्र होते ते म्हणजे अमेरिका . परंतु 1945 नंतर अमेरिका आणि इतर देशांमध्ये अनुचाचणी घ्यायची जणूकाही चढाओढच लागली, ही चढाओढ सर्वात अधिक होती ती त्या काळच्या मित्रराष्ट्र अमेरिका आणि सोविएत रशिया मध्ये आणि ह्याच दोन देशांमध्ये झाली शीतयुद्धाची सुरुवात. आज मितीला 2020 साली जगात सर्वाधिक आण्विक शस्त्र रशियाकडे आहेत असे म्हणतात. जपानवरील अणुबाँब ची संहारकता जगाने बघितली म्हणून त्यानंतर अणुबाँब चा वापर होईल असे कधीच वाटले नाही, असा मृत्यूचं तांडव पुन्हा नको म्हणूनच शीतयुद्ध सारखी नविन युद्धतंत्र विकसित झाली असावीत. शीतयुद्धात प्रत्यक्ष युद्धभूमीवर नाही परंतु अनेक वेगवेगळ्या प्रकाराने युद्ध लढले जाते आणि श्रेय वादाचा अट्टाहास होतो. 1945 नंतर रशिया ची साम्यवाद आणि अमेरिकेचा भांडवलवाद हे एकमेकांना शह देऊ लागले.
1945 ते 1991  अमेरिका आणि रशिया यांच्यात प्रत्यक्ष युद्धसदृश घडामोडी देखील झाल्या परंतु या शीतयुद्धाचा शेवट 1991 मध्ये रशियाचे विभाजन होऊन झाला आणि अमेरिका ही एकमेव जागतिक सत्ता म्हणून अस्तित्वात आली. 2000 सालापर्यंत अमेरिका एकमेव जागतिक महासत्ता होती परंतु 2000 सालानंतर उदय झाला तो म्हणजे चीनच्या अर्थव्यवस्थेचा, साम्यवादाचावरच आधारित असलेली रशीया नंतरची दुसरी महासत्ता म्हणून चीन जगाच्या पटलावर उभे राहिले ते केवळ त्यांच्या चिकाटी आणि दूरदृष्टीने. परंतु 2020 येता-येता याच राष्ट्राने आक्रमकतेची स्वरूप धारण केले आणि पुन्हा 1945 सारखी स्थिती तयार झाल्या सारखे भासते. मुळात दोन्ही राष्ट्र जबाबदार असल्याने अणु हल्ल्याचा प्रयोग करणार नाहीत परंतु आक्रमकता जेव्हा शिगेला पोहोचते तेव्हा युद्ध ही राष्ट्र प्रेरणेतून नाही तर व्यक्ती केंद्रित होतात हे हिटलरने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. म्हणून शी जिनपिंग आणि डोनाल्ड ट्रम्प या व्यक्तींनी देखील सदविचाराने वागणे जगाच्या भल्यासाठी तितकेच गरजेचे आहे. 6 ऑगस्टला ’लिटिल बॉय’ आणि त्यापुढील पॅट मॅन त्यांची पुनरावृत्ती होऊन पुन्हा एखाद्या हिरोशिमा-नागासाकीचा जन्म झालाच तर ते जगाला परवडणारे नाही.

               

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *