Akurdi News : अन्नदानातून भाकरीचे आणि घामाचे नाते तयार होते : कॉम्रेड अजित अभ्यंकर

Akurdi News : अन्नदानातून भाकरीचे आणि घामाचे नाते तयार होते : कॉम्रेड अजित अभ्यंकर

कॉम्रेड अजित अभ्यंकर, कॉम्रेड गणेश दराडे, कॉम्रेड अपर्णा दराडे यांनी  केले अन्नदान
Pckhabar- अन्नदानातून भाकरीचे आणि घामाचे नाते तयार होते,  श्रमिकांच्या पोटात भुकेची आग आहे, ते हतबल आहेत, त्यांना आज अन्नाची गरज आहे, असे प्रतिपादन कामगार नेेते, कॉम्रेड अजित अभ्यंकर यांनी केले.

कष्टकरी संघर्ष महासंघ आणि फेरीवाला क्रांती महासंघाच्या वतीने थरमॅक्स चौक आकुर्डी येथे सुरू केलेल्या अन्नदान कार्यक्रमात आज कॉम्रेड अजित अभ्यंकर, कॉम्रेड गणेश दराडे, कॉम्रेड अपर्णा दराडे यांनी अन्नदान केले.
अजित अभ्यंकर पुढे म्हणाले की, कोरोना काळात कष्टकरी वर्गाच्या भुकेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

देशातील 45 कोटीहून जास्त लोक सरकारच्या रेशनिंगवर जगत आहे. मोठमोठ्या औद्योगिक शहरात नोकरी गेलेले, कामापासून वंचित झालेले लोक अच्छे दिन कधी येणार याची वाट पहात आहेत. ज्यांच्याकडे आधारकार्ड, रेशनकार्ड नाही असे लाखो लोक अन्नासाठी आसरा शोधत आहेत. अन्नदानातून भाकरीचे आणि घामाचे नाते तयार होते.

श्रमिकांच्या पोटात भुकेची आग आहे,ते हतबल आहेत,त्याना आज अन्नाची गरज आहे. अशा गरजू लोकांना दररोज अन्नदान करून त्याच्या भुकेचा प्रश्न कष्टकरी महासंघाचे नेते काशीनाथ नखाते यांनी सोडवला आहे. त्यांचे हे कार्य अनुकरणीय आहे, असेही अभ्यंकर म्हणाले.

स्थलांतरित आणि गरजू श्रमिकांसाठी हा उपक्रम पिंपरी चिंचवड शहरात प्रथमच सुरू झाला आहे. निवडणुकीचे वेळी मतदानकेंद्रा समोर बूथ लावणारी मंडळी दिसेनाशी झाली आहेत,आणि कष्टकरी चळवळीतील नेत्यांना भाकरीचा प्रश्न सोडवण्यासाठी अन्नदानाची चळवळ सुरू करण्याची वेळ आली आहे.

यावेळी राजेश माने, उमेश डोर्ले, संजय कांबळे, सीमा शिंदे, विजया पाटील हे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *