Article By Profesor madhuri patil: ‘ध्यास वाचन संस्कृतीचा’

 

प्रा.पाटील माधुरी सचिन
जिजामाता ज्युनिअर कॉलेज ऑफ एज्युकेशन, सातारा


भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना विनम्र अभिवादन

Pckhabar- १५ ऑक्टोबर हा दिवस भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा केला जातो. आजच्या या भौतिकवादी सुखाकडे धाव घेणाऱ्या तरुण पिढीसाठी वाचनास महत्त्व देणाऱ्या आणि स्वकर्तुत्वावर मोठी झालेली माणसं, त्यांच्या जीवनाचा खडतर प्रवास, संघर्षाच्या आणि संकटाच्या मालिका त्यांच्या स्वागतासाठी उभ्या होत्या ,नियती त्यांची सत्त्वपरीक्षा घेत होती तरीही मोडून न पडता ही माणसं संकटावर स्वर झाली आणि आपल्या वाचनवेडाने जीवनाबद्दलची निष्ठा, प्रचंड ध्येयवाद, दुदर्म्य इच्छाशक्ती, अथक परिश्रम आणि सकारात्मक दृष्टिकोनाच्या बळावर त्यांनी मोठी झेप घेतली म्हणून त्यांचा जीवनग्रंथ समृद्ध आणि संपन्न झाला आणि कदाचित आज विसर पडलेला तरूणाईसाठी तो प्रेरणादायी ठरेल यासाठीचा हा आशावाद…

वाचनप्रेरणा दिन हा दिवस फक्त आजच्याच दिवसापूरता मर्यादित रहायला नको याचा विचार व्हावा यासाठी वाचनवेड्या आणि ध्येयवेड्या माणसांच्या गोष्टी… आपल्याला कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर त्या क्षेत्रातील नवीन माहीती, नवीन कौशल्ये आत्मसात करावी लागतात मग त्यासाठी वाचनाशिवाय दुसरा पर्याय नाही. माणसाच्या जीवनात एक चांगले पुस्तक अनेक चांगल्या भूमिका बजावतात. डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम म्हणतात ‘पुस्तकाच्या सहवासात मला ज्ञानाबरोबर नेहमीच आनंद मिळालाय, माझ्या घरात सुमारे ५० हजार पुस्तकांचा संग्रह आहे. माझं ग्रंथ संग्रहालय ही माझी सर्वात मोठी मौल्यवान ठेव आहे आणि तेथे व्यतीत केलेला प्रत्येक क्षण सर्वात मौजेचा व समाधानाचा आहे’.आणि ते म्हणतात वाचनामुळे मेंदुला चालना मिळते, चांगल्या शब्दांमुळे त्यात आणखी भर पडते म्हणूनच आजच्या दिवसापासून आवडणाऱ्या विषयापासून वाचायला सुरुवात करूया आणि वाचनाचा छंद लावून घेऊया.

किताबे कुछ केहना चाहती है,
तुम्हारे पास रेहना चाहती है….
या सफदर हाश्मी यांच्या कवितेतील ओळी, पुस्तकाचे मानवी जीवनातील महत्व नेमकेपणाने अधोरेखित करणाऱ्या आहेत ,खरचं पुस्तके माणसाच्या जीवनात महत्वाची आहेत का?माणसाला नेमके काय शिकवितात? असे प्रश्न सर्वसामान्य माणसाला पडू शकतात यासाठीच मी एक उदाहरण देऊ इच्छिते, एकदा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे एक माणूस आपल्या मुलाला घेऊन आला आणि बाबासाहेबांना म्हणाला बाबासाहेब माझ्या मुलाला तुमच्यासारखे बनवायचे आहे – बाबासाहेब शांत ऐकत होते बाबासाहेब त्या मुलाला आणि त्याच्या वडिलांना त्यांच्या अभ्यासिकेत घेऊन गेले आणि बाबासाहेबांनी आपले शर्ट काढले ,त्यानंतर बनियन काढले व आपल्या पाठीवरचे व्रण दाखविले. आणि बाबासाहेब म्हणाले या एकाच खुर्चीवर २१ -२१ तास सतत अभ्यास ,वाचन करून हे व्रण तयार झाले आहेत. बाबासाहेब यांचे वाचनच इतके होते म्हणून त्यांना ‘सिम्बॉल ऑफ नॉलेज’ म्हणतात. बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे ‘जर तुमच्याकडे २ रुपये असतील तर एक रुपयांची रोटी घ्या आणि एक रुपयांचे पुस्तक घ्या ,रोटी तुम्हाला जगण्यास मदत करेल तर पुस्तक तुम्हाला जगावे कसे ते शिकवेल.’यावरून असे लक्षात येते सर्वात प्रथम तर जो काही विचार करतो त्यामध्ये वाचन आणि त्यानुसार केलेला विचार असा प्रवास असतो. विचार केला की तशा भावना येतात आणि भावना आल्या की कृती होते.

याचबरोबर या महाराष्ट्रात आजवर अनेक वक्ते होऊन गेले .एक तत्वचिंतक, आत्मचिंतन करणारा एक प्राध्यापक, योगमय जीवन जगणारा एक साधक अशी ज्यांच्या व्यक्तिमत्वाची विविध रूप आहेत असे एक तत्वनिष्ठ वक्ते आणि वाचक महाराष्ट्राला मिळाले ते म्हणजे प्राचार्य शिवाजीराव भोसले. १९४२ च्या आसपासचा काळ प्राचार्य सातारला रयत शिक्षण संस्थेत शिक्षण घेत होते. शाळा अधूनमधून बंद पडत होत्या. वेळ कसा घालवायचा म्हणून शिवसजीराव जवळच असलेल्या नगरवाचनालयात जाऊ लागले.’ पुस्तके घरी नेण्यासाठी तुम्हाला चार आणे द्यावे लागेल आणि दोन रुपये डिपॉझिट म्हणून जमा करावे लागतील असे ग्रंथपालांने सांगितले, ही रक्कम शालेय शिक्षण घेणाऱ्या शिवजीरावासाठी जास्त होती पण तरीदेखील त्यांनी व्यवस्था केली. त्या ग्रंथपालाने त्यांना राजयोग नावाचे पुस्तक दिले. राजा होण्याचे भाग्य ज्या पुस्तकामुळे लेखक होते स्वामी विवेकानंद. पुस्तक वाचायला सुरुवात केल्यावर त्यांच्या हे लक्षात आले की पुस्तक अगम्यच आहे. त्यांनी ते पुस्तक न वाचताच परत केले पण त्यांच्या मनात कुठेतरी विवेकानंद या लेखकाला, व्यक्तिमत्वाला आणि पुस्तकातल्या काही आशयाला प्रवेश मिळाला तो भाग तसाच तिथे स्थिरावला आणि अंतर्यामी रुतला त्यांना मार्गदर्शन करणारा असा कुणी गुरू नव्हता, स्वतःच मार्गदर्शन वाचनातून स्वतः करवून घेत त्यांची वाटचाल सुरू होती. अनेक प्रयोग ग्रंथांना प्रमाण मानून करीत होते.

सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे वाचनामुळे बुद्धीचा विकास होते. चांगली पुस्तके वाचल्यामुळे आपल्या विचारांमध्ये भर पडते. वृत्तपत्र वाचून आपण बाहेरच्या जगाची माहिती मिळवू शकतो. वाचनामुळे ज्ञानात भर पडते. एखाद्या विषयावर चर्चा सुरू झाली तर आपल्याला योग्यरित्या आपले विषय मांडता येते. अवांतर वाचन केल्याने आपले सामान्य ज्ञान वाढते. वाचनाने आपल्या भविष्याची जडणघडण योग्यरीत्या होते. माणसाचे जीवन यशस्वी करण्यात वाचनाचा महत्वाचा वाटा असतो म्हणूनच शेवटी …
वाचाल तर वाचाल
हे बोल आहेत खरे,
वाचन अन शिक्षणाने
उजळून निघेल जीवन सारे…

 

महत्त्वाचा बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/

(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *