Maharashtra News: बैलगाड्या शर्यती पुन्हा सुरू करण्यासाठी राज्यशासन कटिबद्ध : पशु संवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनील केदार

Maharashtra News: बैलगाड्या शर्यती पुन्हा सुरू करण्यासाठी राज्यशासन कटिबद्ध : पशु संवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनील केदार


Pckhabar-राज्यात बैलगाड्या शर्यती सुरू करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली आहे. बैलगाड्या शर्यतीसंदर्भात वरिष्ठ अधिवक्ता आणि राज्य शासनाचे वकील यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यासाठी श्री.केदार आज दिल्लीत होते. यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

महाराष्ट्राने बैलगाडी शर्यत सुरू होण्याबाबत 2017 रोजी कायदा संमत केला होता. तथापि, त्यास मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती.  त्यानंतर, शासनाने या आदेशास अनुसरून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. हे प्रकरण विस्तारित बेंचकडे प्रलंबित असून पुढील आठवड्यात याबाबत निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून होण्याची शक्यता आहे. याबाबतच्या सविस्तर चर्चेसाठी महाराष्ट्र शासनाच्यावतीने उपस्थित अधिवक्त्यांशी चर्चा करण्यात आले असल्याचे श्री.केदारे यांनी नमूद केले.

देशातील इतर राज्यात तामिळनाडू, कर्नाटक, मध्यप्रदेश आंध्रप्रदेश, पंजाब, गुजरात, छत्तीसगढ येथे आजही बैलगाड्यांच्या शर्यती होत असतात. मात्र मुंबई उच्च न्यायालायाच्या स्थगितीमुळे महाराष्ट्रात शर्यतींना बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी उठवावी व बैलगाड्यांच्या शर्यती पुन्हा राज्यात सुरू व्हाव्यात यासाठी आपण दिल्लीत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

राज्यशासन यासाठी सातत्याने पाठपुरावा करीत असून यावर अंतरिम आदेश सर्वोच्च न्यायालयाने द्यावा अशी मागणी केली आहे. महाराष्ट्र शासनाच्यावतीने वरीष्ठ अधिवक्ता म्हणुन ॲङ मुकूल रोहतगी, ॲड. शेखर नापडे आणि ॲड.सचिन पाटील  यांची नेमणूक केल्याची त्यांनी माहिती दिली.

महाराष्ट्रात बैलगाडी शर्यतीची 400 वर्षांपेक्षा जुनी पंरपरा आहे. “बैलगाडी शर्यत” हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. शर्यतीसाठी शेतकरी खास खिल्लार जातीचे बैल वापरतात त्यांचे संगोपण करतात. खिल्लार ही महाराष्ट्रातच सापडणारी बैलांची जात आहे. शर्यती बंद असल्यामुळे खिल्लारच्या खोडांना मागणी बंद झाली, तसेच शर्यती बंद असल्यामुळे गावांच्या जत्रा भरत नाहीत. शेतकऱ्‍यांच्या जीवनातील हा सांस्कृतिक  भाग म्हणून याकडे पाहण्यात यावे, अशी मागणीही बैलगाडा संघटनेची असल्याचेही श्री.केदार यांनी यावेळी सांगितले.

पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. शैलेश येंडे, सहायक आयुक्त डॉ. प्रशात भड आणि अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे राज्याचे प्रतिनिधी रामकृष्ण टाकळकर, संदीप बोदगे हे ही याप्रकरणाच्या पाठपुराव्यासाठी राजधानी दिल्लीत आहेत.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *