विनापरवाना कीटकनाशक तयार; एकाला अटक
Pckhabar- शासनाची परवानगी न घेता एका कंपनीने कीटकनाशकाची निर्मिती, साठा आणि विक्री केल्याबद्दल कंपनीचे संचालक मंडळासह अन्य एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी एकाला अटक केली आहे. ही घटना मारूंजीतील पीसीआय पेस्ट कंट्रोल या कंपनीत घडली.
अमर सुरेश राउत (वय 31, रा. गायकवाड नगर, आळंदी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. मे. पीसीआय पेस्ट कंट्रोल प्रा. लि. या कंपनीच्या संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कृषी विभागाचे खत निरीक्षक तथा जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक रविशंकर सिद्धेश्वर कावळे (वय 32) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींची मारुंजी येथे पीसीआय पेस्ट कंट्रोल प्रा. लि. ही कंपनी आहे. या कंपनीत आरोपींनी शासनाची कोणतीही परवानगी न घेता 27 लाख 94 हजार 185 रुपये किमतीचे कीटकनाशकाचे उत्पादन केले. त्याची साठवणूक करून विक्री केली. हा प्रकार कृषी विभागाच्या निदर्शनास येताच शासनाच्या वतीने आरोपींवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.















Leave a Reply