Pimpri News: स्किल इंडिया नव्हे डेथ इन इंडिया – काशिनाथ नखाते

Pimpri News: स्किल इंडिया नव्हे डेथ इन इंडिया – काशिनाथ नखाते

२५ हजार बेरोजगारांची आत्महत्या

Pckhabar- नोटबंदी व जीएसटी मुळे अर्थकारणावर फार मोठा गंभीर परिणाम झाला आणि  देशभरामध्ये साठ लाखापेक्षा  उद्योग बंद  झाले,नोकऱ्यावर परिणाम झाले. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे अनेक बेरोजगारांनीं मृत्यूला कवटाळले आहे.
देशभरामध्ये २५  हजारापेक्षा अधिक लोकांनी आत्महत्या केल्या असल्याची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय  जाहीर केले हे अत्यंत खेदजनक असून केंद्र सरकार नोकरी देण्यामध्ये अपयशी ठरले आहे. येथे स्किल इंडिया द्वारे नोकरी नाही तर  केंद्राच्या चुकीच्या धोरणामुळे “डेथ इन  इंडिया”  आहे असे मत कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, कष्टकरी संघर्ष महासंघ आणि महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे आयोजित स्वंयरोजगार  सभेच्या निमित्ताने ते बोलत होते. रोजगार निर्मिती बाबत व आवश्यकतेनुसार छोटी कर्जे आणि उपलब्ध नोकऱ्यांची माहिती देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष राजेश माने, भास्कर राठोड, कार्याध्यक्ष इरफान चौधरी, चंद्रकांत कुंभार, अनिल बारवकर, विश्वास कदम, सुनील डोंगरे ,आनंत मोरे, विनोद गवई ,यासीन शेख, सलीम डांगे ,मनीष जाधव आदी उपस्थित होते.
नखाते पुढे म्हणाले, “गेल्या दोन वर्षात साठ लाखापेक्षा अधिक सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग कायमचे बंद झाले, गेल्या दोन वर्षात लाखो रोजगार संपले आहेत. एका अहवालानुसार १५ ते ६५ वयोगटातील कामकरी लोकसंख्येचे  बेरोजगारीचे प्रमाण ७.३१ आहे. वय २० ते २९ वयोगटातील ५६ टक्के युवती आणि २३ टक्के युवक हे बेरोजगार आहेत .दहावी पेक्षा जास्त शिक्षण असलेल्या बेरोजगारांची देशातील संख्या तीन कोटी ९४लाख आहे. दर वर्षी दोन कोटी रोजगार देण्याची केंद्राची घोषणा ही केवळ फसवी ठरली  आहे .नोट बंदी मुळे अनेक उद्योजक, व्यावसायिक व्यवसाय करण्याचे धाडस करत नाहीत. अनेक व्यावसायिकांना छोट्या- मोठ्या उद्योजकांना जाचक अटी आणि त्रुटी असल्यामुळे भयानक बेरोजगारी पसरली, कोरोना च्या कालावधीमध्ये अनेक व्यवसायवर फार गंभीर परिणाम झाला असून कोरोना  कालावधीमध्ये थकलेल्या कर्ज हप्त्याचे सिबिल वरती परिणाम होणार नाही असे स्पष्ट मत केंद्र सरकारने जाहीर केले होते, मात्र यामध्ये कोट्यावधी लोकांचे सिबिल खराब झाले आणि त्यांना ना आता नोकरी आहे, ना व्यवसाय करता येतो अशी परिस्थिती आहे. यातुन  सावरण्यासाठी उद्योजकांना केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये केवळ आकडेवारी दाखवण्यात आली.मात्र प्रत्यक्षामध्ये त्याचा लाभ लघुउद्योजकांना किंवा व्यावसायिकांना झालेलाच नाही याचा गंभीर परिणाम हा आत्महत्या वरती झालेला आहे.यावर वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे अन्यथा २५ हजार आत्महत्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढून लाखाच्या पुढे जाण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *